पुणे: ‘मी जेव्हा राजकारणात आले तेव्हा माझ्यावर विश्वास ठेऊन, मला संधी देणारे हे केवळ नरेंद्र मोदी होते, त्यामुळे जेव्हा ते सक्रीय राजकारणामधून निवृत्त होतील, तेव्हा मीदेखील राजकारण सोडेन,’ असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी केले. ‘वर्डस् काउंट’ या शब्दोत्सवाच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या.
उद्योजक अतुल चोरडिया, सागर चोरडिया, महोत्सवाच्या आयोजक वर्षा चोरडिया, सबिना संघवी आणि ‘वर्डस काउंट’ या संकल्पनेच्या प्रणेत्या अद्वैता कला या वेळी उपस्थित होत्या. या वेळी ‘स्क्रिप्टिंग हर स्टोरी- फ्रॉम स्टार टू स्टार कॅम्पेनर’ या विषयावर अद्वैता कला यांनी स्मृती इराणी यांची मुलाखत घेतली.
स्मृती इराणी म्हणाल्या, ‘आमचे सरकार हे विकासाच्या मुद्द्यावर, तर संघटन हे राजकारणावर सुरू असून, एक राजकीय पक्ष म्हणून आम्हाला राजकारण करावेच लागते;मात्र विकासाचा मुद्दा हा आमच्या सरकारसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे.’
नरेंद्र मोदी यांच्या नंतर कोण, असा प्रश्न विचारला असता, तो ठरविण्याचा अधिकार हा जनतेला आहे, असे उत्तर स्मृती इराणी यांनी दिले.
यंदादेखील अमेठीमधून निवडणूक लढवणार का, या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, ‘२०१४ मध्ये कोण स्मृती इराणी हा प्रश्न अनेकांनी केला; मात्र आता २०१९ मध्ये सगळ्यांना ‘स्मृती इराणी कोण आहेत’ हे माहिती आहे. मी अमेठीतून निवडणूक लढविणार की नाही याचा निर्णय पक्षाध्यक्ष अमित शहा हेच घेतील.’
‘आज विविध माध्यमांचा सर्वत्र प्रभाव आहे. काही दशकांपूर्वी जेव्हा हा प्रभाव नव्हता, तेव्हा सुमित्रा महाजन आणि सुषमा स्वराज यांसारख्या महिला नेत्यांनी आपला राजकारणातील प्रवास सुरू केला होता. तो काल आजच्या काळापेक्षा नक्कीच कठीण होता. त्यामुळे या दोघीही माझ्यासाठी प्रेरणा आहेत,’ असेही इराणी यांनी या वेळी नमूद केले.
‘आज देशाची युवा पिढी सक्षम आहे. त्यांना कोणाकडून देखील सल्ले घेण्याची गरज नाही. ही स्मार्ट पिढीच देशाचे भविष्य असून, त्यांची सकारात्मक उर्जा देशाला पुढे नेईल;तसेच स्त्रियांनीदेखील आत्मविश्वासाच्या जोरावर आपले ध्येय साधण्यासाठी इतरांच्या सल्ला आणि सहकार्याची अपेक्षा न करता वाटचाल करावी. भारतीय जनता पक्षाने एक महिला म्हणून दुजाभाव केल्याचा अनुभव मला आजपर्यंत आला नाही. ज्या प्रमाणे पुरुष कार्यकर्ता त्याप्रमाणेच एक महिला कार्यकर्ता म्हणून मला आणि इतर महिला कार्यकर्त्यांना समान वागणूक मिळाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले; मात्र एक महिला अध्यक्ष असलेल्या पक्षाने यासाठी काही केलं नाही ही देशाची व्यथा आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.
‘वर्डस् काउंट’ या शब्दोत्सवात जनता दल (युनायटेड)चे राष्ट्रीय महासचिव पवन वर्मा यांना पंचशील रिअल्टीचे अध्यक्ष अतुल चोरडिया यांच्या हस्ते पहिला ‘वर्डस्मिथ’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या शब्दोत्सवात मजलिस ए इत्तेहदुल मुसलमीन (एमआयएम) या पक्षाचे अध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार असदुद्दिन ओवेसी व भारतीय विद्यार्थी परिषद(अभाविप)चे राष्ट्रीय आयोजन सचिव सुनील आंबेकर हेदेखील सहभागी झाले होते.